शिर्डी -
श्री साईबाबांची शिर्डी हे जागतीक दर्जाचे देवस्थान असून संस्थानचे संदर्भांत विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचेकडून शहानिशा न करता सर्रास बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध करण्यात येतात व त्याचा परिणाम संस्थानचे नावलौकीकावर होतो. आम्ही आपल्या सकारात्मक सुचनांचे सदैव स्वागतच करतो. मात्र विनाआधार नकारात्मक टिका करताना श्रींच्या पवित्र गरीमेस धक्का पोहोचणार नाही यांची दक्षता घ्यावी, असे आवाहन सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींना श्री साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.
श्री साईबाबांनी त्यांचेकडे येणारे साईभक्तांमध्ये कधीही गरीब, श्रीमंत असा भेदभाव केला नाही. श्री साईबाबांचे समोर सर्व साईभक्त समान होते. तसा उल्लेखही श्री साईचरित्रामध्ये आलेला आहे. परंतु काही प्रसारमाध्यमांमार्फत तसा भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असुन ही बाब दुर्दैवी आहे. श्री साईबाबा संस्थानचा कारभार अधिनियम – २००४ च्यानुसार चालतो. तसेच शिर्डी हे जागतीक दर्जाचे देवस्थान असून येथे घडणा-या घडामोडींकडे जगभरातील साईभक्तांचे लक्ष लागलेले असते. त्यामुळे साईबाबा संस्थान संबंधीत बातम्यांची वाचक संख्या मोठी आहे. तथापी संस्थानचे संदर्भांत काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचेकडून शहानिशा न करता सर्रास बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध करण्यात येतात व त्याचा परिणाम संस्थानचे नावलौकीकावर होतो.
श्री साईबाबांचे जीवन कार्य व त्यांची शिकवण यांचा प्रचार-प्रसार करण्यामध्ये प्रसारमाध्यमांचा नेहमीच मोठयाप्रमाणात सहभाग राहीलेला आहे. सद्यस्थितीत प्रसारमाध्यमांना समाजामध्ये अनन्यसाधारण महत्व असले तरीही श्री साईबाबा संस्थानचे संदर्भांत प्रखर बदनामीकारक, विनाआधार, खोटया, प्रतिमा भंजन करणा-या बातम्या प्रसिद्ध करणे विधीवत नाही. मात्र यापुढे संस्थानचे संदर्भांत अशाप्रकारे निराधार, प्रतिमा भंजन करणारे व बदनामीकारक बातम्या छापून आल्यास संबंधितांवर संस्थान व संस्थानचे अधिकारी यांचे बदनामी केलेबाबत भारतीय दंडविधान संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे. तसेच बदनामीकारक बातम्या सोशल मिडीयावर प्रसारीत केलेस आपले माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढे संस्थानचे संदर्भांतील व्यक्तीगत, आर्थिक, सामाजिक, मानसिक बदनामी करणारी बातमी प्रसिद्ध केल्यास याबाबत प्रेस कौन्सिल ऑफ इंडीयाला अवगत करण्यात येईल व त्यास सर्वस्वी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जबाबदार असतील, असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.