*श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी*
*दि.२४ जून २०२५*
*श्री साईबाबा संस्थान कडून इ.११ वी व १२ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटीची सु* विधा
संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील तसेच इतर इच्छुक विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनविण्यासाठी, संस्थानतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी स्मार्ट डिजिटल लर्निंग क्लास व कोचिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संस्थानने इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यां करिता एमएचटी-सीईटी कोचिंग क्लासेस चालविण्यासाठी नामांकित संस्थांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत *आकाश एज्युकेशनल सर्विसेस* यांनी प्रति विद्यार्थी प्रति वर्ष केवळ रुपये ३४९९९/- इतक्या न्यूनतम दराने सेवा देण्याचा प्रस्ताव दिल्यामुळे त्यांची निवड करण्याचा निर्णय संस्थान तदर्थ समितीने घेतला आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
आकाश एज्युकेशनल सर्विसेस ही संस्था राष्ट्रीय पातळीवर नामांकित संस्था असून, त्यांचा अनेक वर्षांचा कोचिंगचा अनुभव विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आकाश एज्युकेशनल सर्विसेस या संस्थेकडून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धती व दर्जेदार अध्ययन साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.
या उपक्रमांतर्गत, श्री साईबाबा संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना सवलत दिली जाणार आहे:
• इयत्ता १०वी मध्ये संस्थानच्या शाळेत ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंगचे शिक्षण पूर्णतः विनाशुल्क दिले जाईल. या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी रुपये ३४९९९ संस्थानद्वारे भरली जाईल.
• ९०% पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची कोचिंग फी रुपये ३४९९९ पैकी ५०% रक्कम रुपये १७५०० संस्थानद्वारे भरली जाईल .
• अनाथ, एकल मातांची मुले आणि ज्यांना इयता १० वी मध्ये ८०% पेक्षा जास्त गुण आहेत अशा विद्यार्थ्यांचीही संपूर्ण फी संस्थानद्वारे भरली जाईल.
• श्री साईबाबा संस्थानच्या कनिष्ठ महाविद्यालयात न शिकणाऱ्या बाहेरील विद्यार्थ्यांना संपूर्ण फी रुपये ३४९९९ अधिक जीएसटी रुपये ६३०० अशी एकूण रुपये ४१२९९ भरावी लागेल.
श्री साईबाबा संस्थानचा हा उपक्रम म्हणजे ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळविण्याचा मार्ग सुकर होणार आहे. हा उपक्रम हे संस्थानचे शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे .या योजनेमुळे ग्रामीण भागातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण एमएचटी-सीईटी मार्गदर्शन मिळून त्यांचे अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक क्षेत्रातील प्रवेश स्वप्न साकार होईल, असा विश्वास संस्थानला आहे.